Sunday 29 March 2020

गुलाम मोहंमद

हिंदी चित्रपटातील काही संगीतकारांचे जर नाव घेतले नाही तर हिंदी चित्रपट संगीताचा इतिहास पुर्ण होऊ शकत नाही. गुलाम मोहंमद ह्यांचे नाव त्यात नक्की घ्यावे लागेल. चित्रपट सुष्टी कलाकारांचे जितकी चीज करते तितकीच निष्ठुरपणा दाखवते. असेच काहीतरी गुलाम मोहंमद ह्यांचा सोबत झाले. हिंदी चित्रपट संगीतात सर्व प्रकारचे संगीतकार झाले. काहींनी शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीतावर संगीत दिले तर काहींनी पाश्चात्य संगीताबरोबर प्रयोग पण केलेत. सर्वच प्रयोग उत्तम आहेत. शुद्ध भारतीय संगीतावर संगीत देणारे मोजकेच संगीतकार त्यात गुलाम मोहंमद ह्याचे नाव सन्मानाने घ्यावे लागेल. त्यांनी पाश्चात्य वाद्य वापरली पण ती भारतीय संगीतात अशी मिसळली आहे की कळत नाही.
राजस्थानी लोकसंगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्याचे विद्वान. स्वतः उच्च दर्जाचे तबला, पखवाज, ढोलक वादक आणि नृत्यात पारंगत असे सुंदर मिश्रण गुलाम मोहंमद ह्यांच्यात होते. मुंबई मायानगरी जिथे लोकं आपले नशीब आजमावायला येतात तसे हे पण १९२४ मध्ये आले. पण संघर्ष कठीण होता. पण नियती हिऱ्याची किती दिवस परीक्षा घेणार? सुगीचे दिवस उशीरा ( वर्षांनी) का होईना पण आले. सुरुवातीचे दिवस तबला वादक म्हणून काम केले. त्यात नौशाद ह्यांच्याशी मैत्री झाली. खरे तर गुलाम मोहंमद नौशाद पेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे. पण जेव्हा नौशादांचे चांगले दिवस आलेत त्यांनी आपल्या मित्राला सहाय्यक म्हणुन ठेवले. गुलाम मोहंमद हे नौशाद आणि अनिल बिस्वास ह्याचे सहाय्यक म्हणून १२ वर्षे काम केले. ह्या सर्वांच्या संगीतावर एकमेकाचा प्रभाव दिसतो. गुलाम मोहंमद ह्यांनी ढोलक, चिमटा, डफ, मटका आणि खंजिरी हे वाद्य पहिल्यांदा चित्रपट संगीतात आणले.
पुढे गुलाम मोहंमद ह्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून काम Tiger Queen (१९४७) पासून सुरु केले. पण १९५२ पासून त्यांच्या कामाची लोक दखल घेऊ लागले. राज कपूर, नर्गीस ह्यांचा अंबर ह्या चित्रपटात उल्लेखनीय संगीत दिले. लैला मजनू (१९५३) मधील तलत मेहमूद ह्यांचे 'चल दिया कारवा, लूट गये हम यहा तुम कहा' आणि लता दीदी सोबतचे 'आसमां वाले तेरी दुनिया से दिल घबराया' गाणे सुंदर आहेत. इथून गुलाम मोहंमद ह्यांचे नाव व्हायला सुरुवात झाली. त्याच वर्षी आलेल्या दिल नादान ह्या चित्रपटात तलत मेहमूद ह्यांनी 'जिंदगी देने वाले सुन, तेरी दुनियासे दिल भर गया' हे अविस्मरणीय गाणे दिले. १९५४ साली आलेल्या मिर्झा गालिब ह्या चित्रपटाने गझल गायकीला एक वेगळेच स्थान चित्रपटात दिले. तलत मेहमूद आणि सुरैय्या ह्यांनी अप्रतिम गझल ह्या चित्रपट गायल्या आहेत. 'दिल नादान तुझे हुआ क्या है', 'इश्क मुझको नही वहशत ही सही' जरूर ऐका. शमा ह्या चित्रपटातीलसुरैय्या ह्यांनी गायलेले 'धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम' अप्रतिम आहे. शम्मी कपूर ह्यांच्या पहिल्या (कदाचित?) चित्रपटात एक गाणे शमशाद बेगम आणि रफींनी गायले आहे. ते गाणे हिंदी चित्रपटातील कदाचित पहिले rap song असेल 'ला दे मोहे बालमा आसमानी चुडीया'. मधल्या काळात त्यांनी बऱ्याच चित्रपटांना संगीत दिले, चांगले पण दिले. पण हिंदी चित्रपट सृष्टीचा निष्ठुरपणा त्यांना भोवला. ह्या गुणी संगीतकाराने केलेल्या कामाचे व्हावे तेवढे कौतुक झाले नाही.
त्यांच्या कारकिर्दीचा उच्चबिंदु म्हणजे पाकीजा. कमाल अमरोही ह्यांनी ह्या हिऱ्याची कदर केली आणि हा चित्रपट त्यांना दिला. गुलाम मोहंमद ह्यांच्या संगीताने हा चित्रपट हिंदी चित्रपटातील संगीतासाठी एक मानबिंदु झाला. ह्या चित्रपटात गुलाम मोहंमद ह्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि त्यांच्या नृत्य कलेचे संपूर्ण ज्ञान वापरून संगीत दिले. त्यांचा छोटा भाऊ अब्दुल करीम हा ताकदवर तब्बलजीने आणि स्वतः गुलाम मोहंमद ह्यांनी अजरामर ठेका ह्या चित्रपटातील गाण्यात वापरला आहे. लता दीदींनी एकावर एक अशी सुंदर गाणी ह्या चित्रपटात गायली आहेत. 'आज हम अपनी दुवाओ असर देखेंगे, तीर नजर देखेंगे'. ह्यातील मुजरा 'थारे रहियो बांके यार' मधील तबल्याचा ठेका ऐका. 'मोसम हे आशिकाना' हे पण सुंदर आहे. लता दिदी आणि रफ़ी ह्यांचे 'चलो दिलदार चलो चांद के पार चलो' आणि कळस म्हणजे 'चलते चलते युही कोई मिल गया था' आणि 'इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा'  ह्यातला तबला एक मानबिंदु आहे. मी एक कानसेन आहे. जे मला आनंद देतात त्या बद्दल लिहतो पण संगीताची सखोल चिकित्सा माझे काम नव्हे. संगीततज्ञानी ह्या चित्रपटाच्या संगीताचे विस्तृत चिकित्सा केली असेलच. ते हा चित्रपट पूर्ण करू शकले नाही. पुढे त्यांच्या मित्राने म्हणजे नौशाद ह्यांनी पूर्ण केला. हा चित्रपट १९७२ साली प्रकाशित झाला तेव्हा गुलाम मोहंमद ह्या जगात नव्हते. ह्या गुणी कलाकाराचे सारे कौतुक त्यांच्या गेल्यानंतर झाले. गुलाम मोहंमद ह्यांच्या उल्लेखाशिवाय हिंदी चित्रपट संगीताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.
ही सर्व गाणी जरूर ऐका तुम्हाला अभिजात संगीत ऐकण्याचा आनंद जरूर मिळेल.

सतीश गुंडावार
२९-मार्च-२०२०

रा. स्व. संघाचे विज्ञान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत नुकत्याच एका भाषणात म्हणाले की, एक स्वयंसेवक संघाची पुनर्निर्मिती करू शकतो.” त्यांच्या ह्या वक्तव्यात संघाचे संस्थापक, आद्यसरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार ह्यांच्या संघाच्या निर्मिती मागील चिंतनाचे संपूर्ण सार आहे. ना. . पालकर ह्यांनी लिहिलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात, त्यांच्या राजकीय आणि क्रांतिकारक जीवनातील अनुभवांवरून, हिंदू धर्माच्या आणि त्यातून भारताच्या समस्या व प्रश्न हे फक्त प्रशिक्षित आणि संघटित हिंदूच दूर करू शकतो हा निष्कर्ष दिसतो. संघाचा स्वयंसेवक एक तास शाखेत जातो आणि उरलेले २३ तास संघाचे संस्कार आपल्या व्यक्तिगत जीवनात वापरत असतो. इतकी वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना मला संघाच्या कामाची पद्धत आणि आधुनिक व्यवस्थापन शास्त्र आणि विज्ञान ह्याचा सुंदर मेळ दिसतो.
राष्ट्राच्या आणि धर्माच्या उभारणीसाठी अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. पण त्या कामाचा आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीच्या पश्चात तिने चालू केलेले काम बिकट परिस्थितीत जाऊन नष्ट होते. इंजिनीरिंगमध्ये पर्पेच्युअल मशिन अशी संकल्पना आहे म्हणजे, ते यंत्र कायम सुरु असेल बंद पडत नाही. त्याप्रमाणे अपेक्षित प्रशिक्षण घेवून संघटित झालेला हिंदू समाज आपल्या हिंदू धर्माचे उत्थान करायला किती वर्षे लागतील ह्याचा निश्चित अंदाज डॉ. हेडगेवार यांच्या चिंतनात असेल. त्यांनी संघटनाचा असा काही मंत्र दिला की, संघटन आपल्या पश्चात निरंतन सुरु राहील. आजपर्यंत संघावर अनेक संकटे आली; गांधीजींच्या हत्येनंतरची बंदी, इ.स. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी, पण संघाचे काम सुरु राहिले आणि वाढतच गेले. डॉ. हेडगेवार यांनी त्यांच्यासारखे काम करणारे, विचार करणारे, आचार करणारे असंख्य स्वयंसेवक घडवले. ही प्रक्रिया पर्पेच्युअल आहे, आजही सुरु आहे आणि भविष्यात सुरु राहील. डॉ. हेडगेवार यांना प्रत्यक्ष बघितलेल्या स्वयंसेवकांची संख्या आता फारशी नाही. पण त्यांचे प्रतिबिंब प्रत्येक स्वयंसेवकात कमी जास्त प्रमाणात दिसते हेच डॉ. हेडगेवार यांच्या चिंतनाचे यश आहे.
न्यूक्लियर फिजिक्समध्ये चेन रिअॅक्शन अशी एक संकल्पना आहे. संघाच्या स्वयंसेवकाने स्वयंसेवक घडवण्याची चेन रिअॅक्शन निर्माण केली आहे, जी १९२५ साली सुरु झाली ती अजूनही सुरु आहे. ही चेन रिअॅक्शन थांबवणे आता अशक्य आहे. अश्या पर्पेच्युअल चेन रिअॅक्शनमधून काय निर्माण झाले तर त्याला संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक श्री. माणिकराव पाटील, परीस म्हणतात आणि हे परीस असे आहेत की, ह्याच्या स्पर्शाने सोने होता अजून परीस तयार होते. संघाच्या ९५ वर्षाच्या वाटचालीत संघाचे अस्तित्व संपवण्याचा खूप प्रयत्न झाला. बाहेरून संघ संपवण्याचे प्रयत्न सर्वांना माहीत आहेत. मी बऱ्याच वरिष्ठ स्वयंसेवकांना विचारले की, कधी संघ आतून पोखरून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला काय? कोणालाही असा प्रयत्न माहीत नाही किंवा ऐकलेले नाही. पण समजा असे प्रयत्न झाले असतील तर ह्याच परीसाचा प्रभाव असेल की असे सर्व प्रयत्न विफल झाले असतील.
कोणत्याही उत्तम आणि प्रगतीशील कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे सतत नावीन्यपूर्ण (इनोव्हेशन) वाटचाल, सतत ट्रान्झिशन प्लॅनिंग, मेंटॉरशीप, चेंज मॅनेजमेंट आणि ट्रेनिंग, रिस्किलींग, मल्टिस्किलींग त्यानंतर डाव्हर्सिफिकेशन. संघाच्या कार्यपद्धतीमध्ये हे सातत्याने बघायला मिळते. संघाच्या कार्यविभागाचे प्रशिक्षण वर्ग, मासिक बौद्धिक वर्ग, संघाची हिवाळी शिबिरे, संघ शिक्षा वर्ग, संघाच्या दरवर्षी होणाऱ्या नियुक्त्या आणि त्यात सहजपणे होणारे जबाबदाऱ्यांमधील बदल हे तर मला कॉर्पोरेट क्षेत्रात अपवादानेच बघायला मिळतात. संघाने नुकताच आपल्या गणवेषात बदल केला, त्याची चेंज मॅनेजमेंट, ही एक कॉर्पोरेट केस स्टडी होऊ शकते.
एक यशस्वी कंपनी आपल्या प्रगतीसाठी डायव्हर्सिफिकेशन करते. डॉ. हेडगेवार यांच्या काळात राष्ट्र सेविका समितीच्या रूपाने पहिले डायव्हर्सिफिकेशन झाले होते. नंतर गांधीजींच्या हत्येनंतरच्या बंदीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सुरुवात झाली होती. त्यानंतर जनसंघाची (राजकीय पक्ष) स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांनी सांगितलेल्या, 'संघ काही करणार नाही, संघाचे स्वयंसेवक करतील', ह्या तत्वानुसार संघाचे पुढील काळातील डायव्हर्सिफिकेशन झाले. आज ३५ अन्य मुख्य संघटना आहेत आणि असंख्य सेवा उपक्रम जगभर आहेत. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्यात सर्वोच्च स्थानावर आहेत. ह्या सर्व डायव्हर्सिफाईड कामांच्या कार्याची पद्धत संघाच्या शाखेसारखी किंवा संघासारखी असू शकत नाहीत. ह्या सर्व संघटनांची स्वतंत्र कार्य पद्धती आहे. तशी स्वतंत्र कार्य पद्धती निर्माण करण्याचे मूलभूत चिंतन संघाच्या वरिष्ठ स्वयंसेवकांमध्ये होते आणि आहे. मूलभूत विचार करण्याची शिकवण संघाने स्वयंसेवकांना दिली आहे. अशी मूलभूत विचार करणाऱ्यांची जी साखळी १९२५ साली सुरु झाली ती आज देखील दिसते. प्रसार माध्यमांमध्ये संघाकडे विचारवंत नाही अशी आवई उठवली जाते पण संघाचे विचारवंत प्रसिद्धीच्या मागे पळत नाही हे त्यांना माहीत नसते.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विशाल वृक्ष आणि त्याच्या सोबत असणाऱ्या विविध संघटना यांचे मिळून एक सुंदर उपवन भारतात निर्माण झाले आहे. पण ह्याचे बीज जेव्हा डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली लावले, त्या बीजात ह्याचे सर्व डीएनए होते. ह्या डीएनए चे एक सोपे स्वरूप सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या वक्तव्यात आहे.
आपल्या पश्चात आपल्यासारखा विचार करणारी, समर्पण करणारी, त्याग करणारी असंख्य स्वयंसेवकांची साखळी तयार झालेली असेल, ज्यात आपलेच प्रतिबिंब असेल असे संघटन उभे करणारे आधुनिक काळातील एकमेव द्रष्टा महात्मा म्हणजे पूरमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार!
पू. डॉक्टरांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडवा, शके १८११ म्हणजेच १ एप्रिल१८८९ रोजी नागपूरला झाला. गुढीपाडव्याच्या ह्या पवित्र पर्वानिमित्त त्यांना माझी ही छोटी आदरांजली!!

-    सतीश माधवराव गुंडावार
२४-मार्च-२०२०