Tuesday 30 May 2023

आभाळमाया


मी कराड इंजिनीरिंग मधून १९९० मध्ये पदवी घेतली. कराड तसे मध्यम आकाराचे शहर. एकदा काय कॉलेज सोडले तर त्या शहराला आणि कॉलेजला वारंवार भेट देणारे तसे मी कमी बघितले. पण कराड कॉलेजचे विद्यार्थी मला अपवाद वाटतात. गेल्या ३३ वर्षात कदाचित तितकेच वेळा मी कराडला गेलो असेल. कॉलेजचे आकर्षण एक भाग असला तरी आम्ही बरीच मित्रमंडळी देशपांडे काका आणि काकूंना भेटायला कराडला नक्की जातो.

जीवनात बरीच निःस्पृह, निस्वार्थी, परोपकारी, प्रेमळ, आदर्श मंडळी भेटतात. देशपांडे काका आणि काकू हे त्या पलीकडचे प्रकरण आहे. तसे काका, काकूंच्या घरचे कोणीच आमच्या कॉलेजमध्ये शिकले नाही. पण आमच्या अगोदरच्या बॅचचे आणि आमच्या नंतरच्या बॅचचे कित्येक विद्यार्थी त्यांच्या घरी कायम पडीक असायचे. आम्ही बरेच जण विदर्भातले होतो. घरापासून हजारो किलोमीटर दूर मनात आले की घरी जाता येत नसायचे. काका, काकूंना त्याची जाणीव असावी. त्या भावनेतून कित्येक विद्यार्थ्यांना त्यांनी घरची माया दिली. राणी आणि सुदर्शन ही दोन भावंडे त्यावेळी घरी असायची. ह्या दोघांनी काका काकूंच्या ह्या उपक्रमात मोलाची भर घातली. राणी आमच्यापेक्षा मोठी पण सुदु समवयस्क आहे. सुदु आमच्या मित्रपरिवाराचा एक भाग झाला होता की कित्येक जणांना तो आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे असे वाटायचे.

देशपांडे कुटुंब तसे मध्यमवर्गीय कुटुंब, शेतीच्या उत्पन्नावर कुटुंब चालायचे. तरी सुद्धा काकू प्रत्येकासाठी काहीतरी नेहमीच खायला करायच्या. हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्यांना, मेस मध्ये जेवणाऱ्यांना घरच्या खाण्याचे महत्व काय असते हे फक्त अनुभवानंतर कळते. आमचे जेवण्याचे हाल होत आहे असे बघताच काका, काकूंनी आम्हाला त्यांच्या घराची एक खोली दिली, घरचे भांडे दिलेत आणि स्वतःची मेस सुरु करायला प्रोत्साहन दिले. “Lovely Eight” नावाची आम्ही आठ जणांची स्वसंचालित उत्तम जेवण देणारी मेस उभी राहिली. आमची मेस असली तरी काकू आमच्यासाठी काहीतरी पाठवायच्याच. काकू नेहमी ब्रेडचा उपमा करायच्या. गंजभर ताक तर नेहमीच असायचे. पिकल्या हापूस आंब्याचा साखरआंबा विदर्भातल्या लोकांना नवीनच होता. काकू नेहमी सढळ हाताने सर्वांना द्यायच्या. ब्रेडचा उपमा आणि पिकल्या हापूस आंब्याचा साखरआंबा ह्यांचा प्रवेश माझ्या घरी झाला आणि आजही आमच्या घरी हे पदार्थ होतो.

ह्या उपकारांची थोडी का होईना पण परतफेड करण्याच्या उद्देशाने आम्ही सारे लोक वारंवार कराडला जात असतो. काका, काकू आता नव्वदीत पोहचले आहेत. कोरोनाच्या काळात सर्वच थांबले होते. त्यामुळे गेले वर्षे कराडला जाणे झाले नाही. म्हणून ह्यावेळी आम्ही मित्रांनी ठरवून गेल्या रविवारी कराडला गेलो. त्यांच्या भेटीने मन प्रसन्न झाले. निःस्पृह, निस्वार्थी, परोपकारी, प्रेमळ, अन्नपूर्णा काका काकूंच्या गुणातून एक कणभर गुण जरी आपल्या वागण्यात आला तर त्यांच्या उपकारांची परतफेड होईल आणि कराडला परत येऊ ह्या भावनेने आम्ही परत फिरलो.

सतीश गुंडावार

३०-मे-२०२३

Monday 1 May 2023

रवि


कोणा एका विद्वानाने असे सांगितले की प्रतिभावान व्यक्तीचे समीकरण सांगायचे झाल्यास चार भागात विभागता येईल. त्याचे स्वप्न, इच्छाशक्ती, स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम आणि त्याची बुद्धिमत्ता. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये या समीकरणावर आधारित अनेक व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात. असेच एक संगीतकार रवि! कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेले अचाट प्रयत्नांचे रवि म्हणजे मूर्तिमंत रूप. “चौदहवी का चाँद हो” किंवा “ऐ मेरी जोहरा जबी” ही गाणी कोणी ऐकली नाही असे म्हणणारा व्यक्ती कदाचितच सापडेल. पण जर विचारले की ह्या गाण्यांचे संगीतकार कोण? तर बरेच जण सांगू शकणार नाही. प्रत्येकच प्रतिभावान व्यक्तीला प्रसिद्धी मिळतेच असे नाही. अनेक पुरस्कार प्राप्त गाणी आणि चित्रपट देऊन सुद्धा रविंना हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही.

1950 मध्ये रवि यांचे लग्न झाले होते. त्यांनी 1942 चा बंगालचा दुष्काळ आणि महाभूकमारीचे दिवस बघितले होते. 30 लाख लोकं भूकमारीनी त्यावेळी मेली होती. अशा वेळी सरकारची सुरक्षित नोकरी सोडून आपले स्वप्न पूर्ण करायला रवि मुंबईला आले. सुरवातीची दोन वर्षे अत्यंत परिश्रमाचे, अडचणीचे आणि उपेक्षेचे. पण रविंनी आपली हिम्मत हारली नाही. शेवटी 1952 साली ‘आनंदमठ’ या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. त्या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं “वंदे मातरम्” यात त्यांना कोरस मध्ये गायला मिळाले आणि त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रवास सुरू झाला. रविंचा हिंदी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. आनंदमठचे संगीतकार हेमंत कुमार ह्यांना अशाच एका व्यक्तीची गरज होती. हेमंत कुमारांनी आपले असिस्टंट म्हणून रविंना ठेवले आणि पुढील 2 - 3 वर्षे रविंनी हेमंत कुमार यांची असिस्टंट म्हणून काम केले. हेमंतदा साठी प्रसिद्ध नागिन बिन रवि आणि कल्याणजी या दोघांनी मिळून वाजवली होती.

हेमंतदा बरोबरच्या कामाने त्यांना आर्थिक समृद्धी दिली. पण हेमंतदानी रविंची बुद्धिमत्ता लवकर ओळखली. दोन वर्षानंतर हेमंतदाने सुचवले की स्वतंत्र काम कर. मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनात एकदा काय आर्थिक स्थिरता आली की नवीन जोखीम ओढवून घ्यायची हिम्मत नसते. पण रविंनी ती स्वीकारली. 1955 पासून त्यांनी स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केली.

रविंनी इतके मधुर गीत आपल्याला दिलीत. पण हिंदी चित्रपट सृष्टीतील महान संगीतकारांच्या यादीत त्यांचे नाव लोकं सहसा घेत नाहीत. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी जर आपण बघितली तर लक्षात येईल की जेव्हा आपण भेंड्या खेळतो त्यात येणारी बहुतांश गाणी ही रविंची असतात.

रविंनी त्याकाळातल्या सर्वच गायक गायिकां बरोबर काम केले होते. बी आर चोप्रा, यश चोप्रा, गुरुदत्त सारख्या नामवंत लोकांसोबत त्यांनी काम केले होते. मोहम्मद रफीबरोबर केलेले काम अत्यंत विलक्षण आहे. मोहम्मद रफींचा सर्वात प्रसिद्ध गाण्यांमध्ये रविंच्या गाण्यांची संख्या खूप जास्त आहे. मोहम्मद रफींची ही गाणीचौदवीं का चाँद हो”, “तुम्हारी नज़र क्यों खफा हो गयी”, “हुस्न वाले तेरा जवाब नहीं”, “आजा तुझको पुकारे मेरा प्यार”, “छू लेने दो नाज़ुक होठों को”, “ये वादिया ये फ़िझाये”, “सौ बार जनम लेंगे”, “ये जुल्फ अगर खुल के”, “बाबुल की दुआये लेती जा”, “ झटको जुल्फ से पानी ये मोती फुट जाएंगे”, “दूर रहकर करो बात करीब जाओ”, “आज मेरी यार की शादी है”, “बार बार देखो हजार बार देखो”, “ये झुके झुके नयना”, “ये परदा हटा दो”, “नसीब में जिसके जो लिखा था”, “भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहा जाये”. ही गाणी लोकप्रिय तर आहेच आणि सर्वांना माहित पण आहे.

रफीसारखंच लतादीदींच्या प्रसिद्ध गाण्यातील खुपशी गाणी रविंनी दिलेली आहेत. “बच्चे मन के सच्चे”, “तुम्ही मेरे मंदिर तुम्ही पूजा तुम्ही देवता हो”, “मिलती हैं जिंदगी में मोहब्बत कभी कभी”, “वो दिल कहाँसे लावु तेरी याद भुलाये”, “दिल में किसी के प्यार का जलता हुआ दिया”, “गैरों पे करम अपनो पे सितम”, “लो आ गयी उनकी याद वो नहीं आए”, “लागे ना मोरा जिया सजाना नहीं आये”, “आज की मुलाकात बस इतनी” ही गाणी लतादीदींच्या लोकप्रिय गाण्यांपैकी काही गाणी.

आशा भोसलेंच्या यशस्वी कारकिर्दीत पी नय्यर, सुधीर फडके यांचे मोलाचे योगदान आहे हे आपल्याला माहित आहे. पण आशाताईंच्या यशस्वी कारकीर्दीत रविंचे पण अत्यंत मोलाचे योगदान आहे. “दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ”, “तोरा मन दर्पन कह लाये”, “हे रोम रोम में बसनेवाले राम”, “चंदा मामा दूरके”, “आगे भी जाने न तू”, “जब चली ठंडी हवा”, “निल गगन पर उड़ते बादल”, “सुन ले पुकार आयी आज तेरे द्वार”. आशाताईंची ही गाणी ऐकली तर लक्षात येईल की रविंनी त्यांच्याकडून सर्व प्रकारची गाणी गावून घेतली.

आशा भोसलेंसोबत महेंद्र कपूर यांची सुद्धा यशस्वी कारकीर्द घडवण्यामध्ये त्यांचे अत्यंत मौल्यवान योगदान आहे. “तुम अगर साथ देने का वादा करो”, “किसी पत्थर की मूरत से मोहब्बत का इरादा है”, “इन हवाओं में इन फिज़ाओ में”, “दिन हे बहार के तेरे मेरे इकरार के”, “बीते हुए लम्हों की कसक साथ होगी”, “नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों”, “ये हवा ये हवा ये फिज़ा ये फिज़ा”, “आप आये तो ख़याले दिले नाशाद आया”. अश्या गाण्यांनी महेंद्र कपूरला मुख्य गायक म्हणून स्थान मिळवून दिले.

किशोरकुमारने रवि सोबत मोजकीच गाणी गायली पण ती पण लोकप्रिय झालीत. “ये रातें ये मौसम”, “हम तो मोहब्बत करेगा”, “दिल में किसी के प्यार का जलता हुआ दिया”. मन्नादा सोबत तर मला एकच गाणे सापडले. “ए मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं” पण ह्या गाण्याने मन्नादांना एक वेगळे स्थान मिळवून दिले.

छोटा मुहं बडी बात. रविंचे संगीत अत्यंत साधे आणि सरळ होते. त्यांचा वाद्यवृंद अत्यंत सीमित पण पुरेसा असायचा. एक किंवा दोन मुख्य वाद्य असायची. त्या वेळेस असा विचार करणारी जे संगीतकार होते त्यात हेमंत कुमार, चित्रगुप्त, जयदेव ह्यांच्या रांगेत रवि येतात. गायकीचा आणि गीतकाराच्या काव्याचा प्रभाव वाद्यवृंदांपेक्षा जास्त पडेल असे संगीत रविंनी दिले. बालपणी वडिलांसोबत जे धार्मिक सत्संगामध्ये भक्तीगीत, कीर्तने आणि भजने त्यांनी गायली. तिच काय ती त्यांची संगीताची शिदोरी होती. याच शिदोरीवर रविंनी आपली संपूर्ण कारकीर्द तयार केली होती. मला तर त्याच्या कित्येक गाण्यांची चाल सारखीच वाटते. रविंनी खूप गझल तयार रचल्या. मला त्यांच्या गझलांवर भजनांचा जास्त प्रभाव दिसतो. कदाचित यामुळेच त्यांचे नाव महान संगीतकारांच्या यादीत घेत नसावे.

सिनेमाच्या संगीतकाराचे तसे स्वतंत्र अस्तित्व नसते. तो निर्माता, निर्देशक, चित्रपटाची कहाणी, चित्रपटात काम करणारे नायक, नायिका, चित्रपटाचा बजेट, चित्रपटातील गाण्याची जागा, गायक, गायिका ह्यांची सर्व बंधने संगीतबद्ध करताना येतात. रविंचा मूळ पिंड जरी भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित असला तरी रविंनी काही अजरामर फ्युजन आणि इंग्रजी चालीवर काही गाणी दिलीत. “आगे भी जाने न तू”, “बार बार देखो हजार बार देखो”, ही गाणी हिंदी चित्रपट सृष्टीतील लॅन्डमार्क फ्युजन गाणी आहेत.

अशी यशस्वी कारकीर्द सुरु असताना रविंनी अचानक हिंदी चित्रपट सृष्टीतून संन्यास घेतला. त्याची कारणं माहिती नाही. पण जेव्हा ते अजून परत आले तेव्हा निकाह सारखा दमदार चित्रपट घेऊन सलमा आगा सारख्या नव्या गायकीचे हिंदी चित्रपट सृष्टीत पक्के पाय रोवून दिलेत. “दिल के अरमा आंसुओं में बह गए” हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते.

रविंनी मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा खूप काम केले. खरतर मल्याळम चित्रपटसृष्टीनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीपेक्षा अधिक पारितोषक मिळवून दिलीत.

जाता जाता रवि आपल्या मराठी चित्रपटातील अभिनेत्री वर्षा उसगावकर हिचे सासरे होत.

 

सतीश गुंडावार

मे २०२३