Sunday, 29 March 2020

रा. स्व. संघाचे विज्ञान


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत नुकत्याच एका भाषणात म्हणाले की, एक स्वयंसेवक संघाची पुनर्निर्मिती करू शकतो.” त्यांच्या ह्या वक्तव्यात संघाचे संस्थापक, आद्यसरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार ह्यांच्या संघाच्या निर्मिती मागील चिंतनाचे संपूर्ण सार आहे. ना. . पालकर ह्यांनी लिहिलेल्या डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात, त्यांच्या राजकीय आणि क्रांतिकारक जीवनातील अनुभवांवरून, हिंदू धर्माच्या आणि त्यातून भारताच्या समस्या व प्रश्न हे फक्त प्रशिक्षित आणि संघटित हिंदूच दूर करू शकतो हा निष्कर्ष दिसतो. संघाचा स्वयंसेवक एक तास शाखेत जातो आणि उरलेले २३ तास संघाचे संस्कार आपल्या व्यक्तिगत जीवनात वापरत असतो. इतकी वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना मला संघाच्या कामाची पद्धत आणि आधुनिक व्यवस्थापन शास्त्र आणि विज्ञान ह्याचा सुंदर मेळ दिसतो.
राष्ट्राच्या आणि धर्माच्या उभारणीसाठी अनेकांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. पण त्या कामाचा आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीच्या पश्चात तिने चालू केलेले काम बिकट परिस्थितीत जाऊन नष्ट होते. इंजिनीरिंगमध्ये पर्पेच्युअल मशिन अशी संकल्पना आहे म्हणजे, ते यंत्र कायम सुरु असेल बंद पडत नाही. त्याप्रमाणे अपेक्षित प्रशिक्षण घेवून संघटित झालेला हिंदू समाज आपल्या हिंदू धर्माचे उत्थान करायला किती वर्षे लागतील ह्याचा निश्चित अंदाज डॉ. हेडगेवार यांच्या चिंतनात असेल. त्यांनी संघटनाचा असा काही मंत्र दिला की, संघटन आपल्या पश्चात निरंतन सुरु राहील. आजपर्यंत संघावर अनेक संकटे आली; गांधीजींच्या हत्येनंतरची बंदी, इ.स. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी, पण संघाचे काम सुरु राहिले आणि वाढतच गेले. डॉ. हेडगेवार यांनी त्यांच्यासारखे काम करणारे, विचार करणारे, आचार करणारे असंख्य स्वयंसेवक घडवले. ही प्रक्रिया पर्पेच्युअल आहे, आजही सुरु आहे आणि भविष्यात सुरु राहील. डॉ. हेडगेवार यांना प्रत्यक्ष बघितलेल्या स्वयंसेवकांची संख्या आता फारशी नाही. पण त्यांचे प्रतिबिंब प्रत्येक स्वयंसेवकात कमी जास्त प्रमाणात दिसते हेच डॉ. हेडगेवार यांच्या चिंतनाचे यश आहे.
न्यूक्लियर फिजिक्समध्ये चेन रिअॅक्शन अशी एक संकल्पना आहे. संघाच्या स्वयंसेवकाने स्वयंसेवक घडवण्याची चेन रिअॅक्शन निर्माण केली आहे, जी १९२५ साली सुरु झाली ती अजूनही सुरु आहे. ही चेन रिअॅक्शन थांबवणे आता अशक्य आहे. अश्या पर्पेच्युअल चेन रिअॅक्शनमधून काय निर्माण झाले तर त्याला संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक श्री. माणिकराव पाटील, परीस म्हणतात आणि हे परीस असे आहेत की, ह्याच्या स्पर्शाने सोने होता अजून परीस तयार होते. संघाच्या ९५ वर्षाच्या वाटचालीत संघाचे अस्तित्व संपवण्याचा खूप प्रयत्न झाला. बाहेरून संघ संपवण्याचे प्रयत्न सर्वांना माहीत आहेत. मी बऱ्याच वरिष्ठ स्वयंसेवकांना विचारले की, कधी संघ आतून पोखरून नष्ट करण्याचा प्रयत्न झाला काय? कोणालाही असा प्रयत्न माहीत नाही किंवा ऐकलेले नाही. पण समजा असे प्रयत्न झाले असतील तर ह्याच परीसाचा प्रभाव असेल की असे सर्व प्रयत्न विफल झाले असतील.
कोणत्याही उत्तम आणि प्रगतीशील कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे सतत नावीन्यपूर्ण (इनोव्हेशन) वाटचाल, सतत ट्रान्झिशन प्लॅनिंग, मेंटॉरशीप, चेंज मॅनेजमेंट आणि ट्रेनिंग, रिस्किलींग, मल्टिस्किलींग त्यानंतर डाव्हर्सिफिकेशन. संघाच्या कार्यपद्धतीमध्ये हे सातत्याने बघायला मिळते. संघाच्या कार्यविभागाचे प्रशिक्षण वर्ग, मासिक बौद्धिक वर्ग, संघाची हिवाळी शिबिरे, संघ शिक्षा वर्ग, संघाच्या दरवर्षी होणाऱ्या नियुक्त्या आणि त्यात सहजपणे होणारे जबाबदाऱ्यांमधील बदल हे तर मला कॉर्पोरेट क्षेत्रात अपवादानेच बघायला मिळतात. संघाने नुकताच आपल्या गणवेषात बदल केला, त्याची चेंज मॅनेजमेंट, ही एक कॉर्पोरेट केस स्टडी होऊ शकते.
एक यशस्वी कंपनी आपल्या प्रगतीसाठी डायव्हर्सिफिकेशन करते. डॉ. हेडगेवार यांच्या काळात राष्ट्र सेविका समितीच्या रूपाने पहिले डायव्हर्सिफिकेशन झाले होते. नंतर गांधीजींच्या हत्येनंतरच्या बंदीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सुरुवात झाली होती. त्यानंतर जनसंघाची (राजकीय पक्ष) स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांनी सांगितलेल्या, 'संघ काही करणार नाही, संघाचे स्वयंसेवक करतील', ह्या तत्वानुसार संघाचे पुढील काळातील डायव्हर्सिफिकेशन झाले. आज ३५ अन्य मुख्य संघटना आहेत आणि असंख्य सेवा उपक्रम जगभर आहेत. ते ज्या क्षेत्रात काम करतात त्यात सर्वोच्च स्थानावर आहेत. ह्या सर्व डायव्हर्सिफाईड कामांच्या कार्याची पद्धत संघाच्या शाखेसारखी किंवा संघासारखी असू शकत नाहीत. ह्या सर्व संघटनांची स्वतंत्र कार्य पद्धती आहे. तशी स्वतंत्र कार्य पद्धती निर्माण करण्याचे मूलभूत चिंतन संघाच्या वरिष्ठ स्वयंसेवकांमध्ये होते आणि आहे. मूलभूत विचार करण्याची शिकवण संघाने स्वयंसेवकांना दिली आहे. अशी मूलभूत विचार करणाऱ्यांची जी साखळी १९२५ साली सुरु झाली ती आज देखील दिसते. प्रसार माध्यमांमध्ये संघाकडे विचारवंत नाही अशी आवई उठवली जाते पण संघाचे विचारवंत प्रसिद्धीच्या मागे पळत नाही हे त्यांना माहीत नसते.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विशाल वृक्ष आणि त्याच्या सोबत असणाऱ्या विविध संघटना यांचे मिळून एक सुंदर उपवन भारतात निर्माण झाले आहे. पण ह्याचे बीज जेव्हा डॉ. हेडगेवार यांनी १९२५ साली लावले, त्या बीजात ह्याचे सर्व डीएनए होते. ह्या डीएनए चे एक सोपे स्वरूप सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या वक्तव्यात आहे.
आपल्या पश्चात आपल्यासारखा विचार करणारी, समर्पण करणारी, त्याग करणारी असंख्य स्वयंसेवकांची साखळी तयार झालेली असेल, ज्यात आपलेच प्रतिबिंब असेल असे संघटन उभे करणारे आधुनिक काळातील एकमेव द्रष्टा महात्मा म्हणजे पूरमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार!
पू. डॉक्टरांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडवा, शके १८११ म्हणजेच १ एप्रिल१८८९ रोजी नागपूरला झाला. गुढीपाडव्याच्या ह्या पवित्र पर्वानिमित्त त्यांना माझी ही छोटी आदरांजली!!

-    सतीश माधवराव गुंडावार
२४-मार्च-२०२०

Wednesday, 11 March 2020

कवी प्रदीप

'ए मेरे वतन के लोगो' हे गाणे न ऐकलेला एकही भारतीय नसेल. हे गाणे कवी प्रदीप ह्यांचे आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या गांधी जयंतीला जी देशभक्ती गीते आपण ऐकतो त्यातली बरीच गाणी ही कवी प्रदीपने लिहिली असतात. हिंदी चित्रपट सृष्टीच्या मायानगरीत आपले सत्व, तत्व आणि साधेपणा टिकवणारे तसे फारच कमी. कवी प्रदीप त्यापैकीच एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आणि गांधीवादी विचाराचे. रामचंद्र नारायण द्विवेदी म्हणजेच कवी प्रदीप. १९३९ साली कवी संमेलनासाठी मुंबईला आले आणि तिथेच हिंदी चित्रपटासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचाच व्यक्तिमत्वासारखे त्यांची गाणी सोपी आणि सरळ भाषेत जी सामान्य माणसाला लगेच कळेल अशी आहेत. हिमांशू रॉय ह्या महान चित्रपट निर्मात्याने ह्या हिऱ्याला शोधून काढले. १९३९ साली कंगन ह्या चित्रपट पासून सुरुवात झाली आणि ती वाढतच गेली.

कवी प्रदीपांनी सगळ्या प्रकारची चित्रपट गीते लिहिली पण त्यांच्या देशभक्ती, सामाजिक आणि धार्मिक गीतांनी हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द केली. त्यांच्या पहिल्या देशभक्ती गीताने तर खूप खळबळ माजवली. १९४३ साली आलेल्या किस्मत चित्रपटातील 'दूर हटो ए दुनियावालो ये हिंदुस्थान हमारा है' हे गाणे साऱ्या देशाने डोक्यावर घेतले. चित्रपट गृहात once more वर once more व्हायचे. चित्रपटगृह चालकाला चित्रपट थांबवून रीळ परत गुंडाळून अजून हे गाणे लावावे लागे. १९४२ च्या चलेजाव चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे गाणे ऐका. ब्रिटिश सरकारने चित्रपटाला परवानगी तर दिली पण हे गाणे सत्याग्रहाचे प्रतीक बनेल हे त्यांना लक्षात आले नाही. ब्रिटिशांनी नंतर ह्या गाण्यावर बंदी घातली आणि कवी प्रदीप ह्यांच्या अटकेचा आदेश काढला.

त्यानंतर महत्वाचा पडाव म्हणजे १९५४ साली आलेला जागृती हा चित्रपट. चित्रपट तसा साधा आणि शाळेवर आधारित कथा पण कवी प्रदीपांनी आपल्या गीतांनी त्या चित्रपटाचे सोने केले. 'आवो बच्चो तुम्हे दिखाये झाकी हिंदुस्तानकी', 'हम लाये हे तुफानसे किश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के, ' दे दी हमे आझादी बीना खडग बीना ढाल, साबरमतीके संत तुने कर दिया कमाल'. ही गाणी इतकी गाजली की पाकिस्तान मध्ये त्याच काळात बेदारी नावाचा चित्रपट आला. त्या चित्रपटात ही गाणी थोडे शब्द बदलून चाली सकट वापरली आहेत.

देशभक्ती गीताचा कळस म्हणजे ''ए मेरे वतन के लोगो' हे गीत. १९६२ च्या चीनच्या युद्धात पराभवानंतर देशबांधवांचे मनोबल उंचावण्यासाठी हे गीत लिहले. १९६३ च्या प्रजासत्ताक दिना निमित्य हिंदी चित्रपट सुष्टीतील महान कलाकारांनी एक कार्यक्रम ठरवला होता. त्या कार्यक्रमात आधीच प्रदर्शित झालेली गाणी होती. हे असे एकच गाणे होते की ते पहिल्यांदा गायले गेले होते. आपण सर्वांना माहीत आहे की हे गाणे ऐकून पं. नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले. लतादिदी म्हणतात की त्यानंतर जेवढे stage shows त्यांनी केलेत त्यात हे गाणे त्यांना गायलाच लागायचे. असा प्रभाव सामान्य जनमाणसावर ह्या गाण्याने केला. कवी प्रदीप ह्यांनी हे गाणे कोणत्याही चित्रपटात वापरू दिले नाही आणि आणि ह्या गाण्याचे संपुर्ण मानधन सैनिकांच्या विधवांच्या संस्थेला दिले.

समाजाचे मनोबल उंचावे, तरुणांना प्रेरणा मिळावे म्हणून कवी प्रदीपनी खूप गाणी लिहिलीत. 'चल चल रे नौजवान', 'इन्साफ कि डगर पे’, 'चल अकेला चल अकेला, तेरा मेला छुटा.. ', 'उपर गगन विशाल' ही गाणी आपण ऐकली आहेत. कवी प्रदिपांनी समाजाला आरसा दाखवायला वडीलकीच्या नात्याने बरीच गाणी लिहली. 'देख तेरे संसार कि हालत क्या हो गयी भगवान कितना बदल गया इंसान', 'इन्सान का इन्सान से हो भाईचारा', ‘कभी धूप कभी छाव', 'अंधेरे मे जो बैठे है, नजर उन पर भी कुछ डालो' आणि बरीच अशी गाणी.

देशभक्ती आणि समाज प्रबोधनाच्या गाण्या सोबत कवी प्रदीप ह्यांनी बरीच धार्मिक गाणी लिहिली. १९७५ साली 'जय संतोषी माँ' हा चित्रपट 'शोले' च्या सोबत प्रदर्शित झाला होता. ह्या चित्रपटाने शोले इतकाच व्यवसाय केला. ह्यातील गाणी खूप प्रसिद्ध झालीत. 'मै तो आरती उतारू रे संतोषी माता की', 'करती हूं तुम्हारा व्रत मै' ही गाणी गावोगावी वाजलीत. अशी जादू कवी प्रदीप ह्यांच्या गाण्याची होती. बऱ्याच जणांचा असा गैरसमज होतो की कवी प्रदीप ह्यांनी फक्त देशभक्ती आणि धार्मिक गाणी लिहिली. त्यांनी बरीच प्रेम गीते आणि चित्रपटाला लागणारी इतर गाणी पण लिहिलीत. 'ना जाने कहा तुम थे' हे सुंदर गाणे कवी प्रदीप ह्यांचेच.

कवी प्रदीप हे सुरेख गायक पण होते. 'देख तेरे संसार कि हालत क्या हो गयी भगवान', 'कभी धूप कभी छाव', आणि बरीच गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांची एक ख्याती होती. गाणे लिहून आणले की त्याची चाल पण सांगायचे. कित्येक संगीतकार त्यांना चाल विचारायचे आणि त्याच चालीवर संगीत द्यायचे.

देशभर शाहीनबाग सारखे आंदोलन बघितले की १९५८ मध्ये प्रदर्शित झालेल्या तलाक चित्रपटात त्यांनी लिहिलेले 'कहनी है एक बात हमे इस देश के पहरेदारोसे, संभल के रहना अपने घर में छिपे हुए गद्दारों से' हे गाणे आठवते. देशार्गंत शत्रू देश तोडायचे कसे काम करत आहे ते त्यांनी १९५८ सालीच लिहून ठेवले आहे. शाहीनबाग, anti CAA प्रदर्शन आणि त्या नंतर जागोजागी होणाऱ्या हिंसाचाराचे समर्पक प्रतिबिंब ह्या गाण्यात आहे. आवर्जुन हे गाणे संपूर्ण ऐका.

लोक त्यांना महाकवी, बापू, पंडितजी ह्या नावाने बोलावयाचे. त्यांचे अजून एक टोपणनाव होते जे माझे पण आहे. त्याचा मला आनंद आहे. त्यांनी काही गाणी Miss कमल B.A. ह्या नावाने लिहिलीत. भारत सरकारने त्यांना १९९७ साली दादा साहेब फाळके पुरस्काराने त्यांच्या कामाचा योग्य गौरव केला. हा blog लिहताना ही सर्व गाणी अजून ऐकली. प्रत्येक गाण्याने डोळे ओलावले. माझी खात्री आहे तुम्ही पण तसाच अनुभव घ्याल.

 

सतीश गुंडावार

१० मार्च २०२०

Friday, 21 February 2020

श्रीकांत ठाकरे

होय ठाकरेच! आज अश्याच एका अवलिया मराठी संगीतकारावर लिहायचा मूड झालाय. ठाकरे म्हटले की शिवसेना आणि बाळासाहेब डोळ्यासमोर येतात. होय त्याच पैकी म्हणजे बाळासाहेबांचे धाकटे बंधु आणि मनसेचे राज ठाकरे ह्यांचे वडील म्हणजे श्रीकांत ठाकरे! प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या साहित्य, कला आणि संगीत ह्याचा सुंदर वारसा पुढे नेणारे श्रीकांतजी. रेडिओवर कधी मोहम्मद रफ़ी किंवा शोभा गुर्टु ह्यांचे मराठी गाणे लागले तर हे गाणे श्रीकांत ठाकरेंचे असावे असा पहिला अंदाज बांधावा. त्यात रफींचे असेल तर संगीत श्रीकांत ठाकरेंचेच असणार.

रफ़ीना मराठीत गावुन घेण्याचे पूर्ण श्रेय श्रीकांत ठाकरेंना जाते. पण त्यांचे मोठेपण ह्यातच नाही. अभिजात मराठी गाण्यात उत्तर भारतीय संगीत थाट, उर्दू आणि हिंदी शब्दांचा मुक्तपणे वापर, ठुमरी, कव्वाली आणि गझल ह्याचा उत्तम वापर करण्याचे पुर्ण श्रेय त्यांना जाते. मराठी गाण्याच्या सुवर्णकाळात त्यांची गाणी संपुर्ण वेगळी आणि अद्वितीय आहेत. गाण्यातील वाद्यसंच सुद्धा आगळावेगळा आहे. त्यांनी सतार, सारंगी, व्हायोलिन, मेंडोलिन, बुलबुलतरंग अश्या तंतु वाद्यांचा विलक्षण मेळ घातला. त्यांनी रफींकडून भावगीते, भक्तीगीते, मराठी गझल, कोळीगीते गावुन घेतलीत. 'शोधिशी मानवा राऊळी मंदिरी', 'प्रभु तू दयाळु', 'खेळ तुझा न्यारा' ही भक्तीगीते आपल्या ओठावर आहेत. रफींनी अवीट भावगीते मराठीत श्रीकांतजींकडे गायली आहेत. 'हे मना आज कोणी' अतिशय अप्रतिम आहे. श्रीकांतजींने रफींकडून प्रेमगीते कव्वाली थाटात गावुन घेतली आहेत. 'हा रुसवा सोड सखे', 'हा छंद जीवाला लागे पिसे' ही गाणी नक्की ऐका. गाण्यात उर्दू आणि हिंदी शब्दांचा मुक्त वापर केला आहे. रफी पंजाबी असून सुद्धा त्यांच्याकडून '', '', '', '', '', '', '' ह्या अक्षरांचा उच्चार अगदी अस्सल मराठी माणसासारखा काढून घेतला. असे ऐकले की रफींना मराठी '' स्पष्ट उच्चारता येत नव्हतं म्हणुन श्रीकांतजींनी आपल्या गीतकारांना '' वापरण्याचा सल्ला दिला होता. रफींनी गायलेली मराठी गझल 'विरले गीत कसे' हे जरूर ऐका. 'अग पोरी संबाल दर्या...' हे कोळीगीत सर्वांचे आवडीचे आहेच आणि हे बालगीत 'प्रकाशातील तारे तुम्ही ..... हसा मुलांनो हसा' आपण कित्येकदा ऐकले असणार. रफींनी मोजकेच मराठी गाणी गायली. परंतु मला खात्री आहे की श्रीकांतजींने केलेल्या गाण्यांनी त्यांना अत्यंत समाधान दिले असणार. 
श्रीकांतजींनी खूप साऱ्या गायकांकडून गावुन घेतले. शोभा गुर्टू आणि दिलराज कौर ह्यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अश्या गायिकेंचा वापर मराठी गाण्यात फक्त श्रीकांतजी सारखे श्रेष्ठ संगीतकार करू शकतात. शोभा गुर्टू ह्यांचीमाझिया प्रियाला प्रीत कळे ना', 'उधड्या पुन्हा जहाल्या' ह्या ठुमरी थाटातील गाणे आपण खूपदा ऐकली आहे. त्यांची 'अधीर याद तुझी जाळीतसे', 'त्यांनीच छेडले गं' ही गाणी पण अप्रतिम आहेतमला विशेष उल्लेख दिलराज कौर ह्यांची 'सांग ना कुठे जाऊ', आणि 'भेट ती तुझी झाली' ह्या गाण्यांचा करावासा वाटतो. संगीत प्रेमींना जरूर आवडतील अशी सुंदर. 

मराठी गाण्यांच्या अमुल्य साठ्यात श्रीकांत ठाकरेंचे एक वेगळे योगदान आहे. त्यांनी केलेली गाणी त्यावेळी सुद्धा अद्वितीय होती आज पण आहेत. त्यांच्या संगीत थाटणीची पद्धत त्यावेळी पण क्रांतिकारक होती. ठाकरे घराण्याचे आगळेवेगळे पण त्यांच्या संगीतातपण दिसून येते. श्रीकांतजी उत्तम संगीतकार असतांना श्रेष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार पण होते. धाकट्या भावाचे आदर्श उदाहरण म्हणायला काहीच हरकत नाही. बाळासाहेबांच्या राजकीय कारकिर्दीत आणि पत्रकारितेत श्रीकांतजींचा पडद्या मागुन सिंहाचा वाटा होता. पण मला असे वाटते की संगीत त्यांचे पहिले प्रेम असावे म्हणून पत्नीचे नाव मधुवंती, मुलीचे नाव जयजयवंती तर मुलाचे नाव स्वरराज (म्हणजेच राज) असे ठेवले. श्रीकांतजी मराठी संगीतातले एक दीपस्तंभ आहेत आणि येणारी पिढी जेव्हा मराठी सुगम संगीताचा अभ्यास करतील तेव्हा त्यांना श्रीकांतजी नक्कीच एक नवीन दृष्टी देतील.

हा ब्लॉग जर समजा राज ठाकरे पर्यंत पोहचला तर माझी त्यांना एक आग्रहाची विनंती असेल की त्यांनी श्रीकांतजींना समर्पित एक संकेतस्थळ तयार करावे आणि त्यात श्रीकांतजींने जो खजिना सोडून गेलेत तो त्यात टाकावा. येणाऱ्या पिढीला त्यातुन खूप प्रेरणा मिळेल.

सतीश गुंडावार
२१-फेब्रु-२०२०